Raju Shetti : काटामारी करून शेतकऱ्यांची सर्रास लूट, पवार काका -पुतणे मुग गिळून का गप्प? राजू शेट्टी यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्य सरकारन AI (कृत्रिम बुध्दीमता ) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता पवार काका पुतण्यांनी विशेष लक्ष देवून राज्यातील सर्व कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपुर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र शेतक-यांनी उसाचे उत्पादन वाढविल्यानंतर कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतक-यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका -पुतणे मुग गिळून का गप्प आहेत ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला.

शेट्टी यांनी साखर आयुक्त सिध्दराम सालिमट यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारकडून AI तंत्रज्ञानासाठी ५०० कोटी रूपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान दिले पाहिजे , उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे यामध्ये दुमत नाही . याकरिता राज्य सरकार जे प्रयत्न करत आहे ते स्वागतार्ह आहे. राज्यातील कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली मात्र उसाचे क्षेत्र तेवढेच राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उस कमी पडू लागल्यामुळे यावर्षी सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी उस गाळप केला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम होवून प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे. राज्यातील कारखानदार यांना माहित होते कि उसाचे क्षेत्र तेवढेच आहे तरीही हव्यासापोटी संगनमताने गाळप क्षमता वाढविली आहे आणि याचाच परिणाम कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर होवून उत्पादन खर्चात वाढ होवू लागली आहे.

राज्य सरकार व कारखानदारांचे शेतक-यांच्या बद्दलचे बेगडी प्रेम असून खरच जर त्यांना शेतकरी हित जोपासायचे होते तर उच्च न्यायालयाने एक रक्कमी एफ. आर. पी चा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नव्हती. साखर कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी राज्य सरकार व कारखानदार मिळून AI तंत्रज्ञानावर भर देत आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व कारखानदार सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करू लागले आहेत याबाबत गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. ज्या तत्परतेने कारखाने AI तंत्रज्ञानासाठी झटत आहेत त्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबविल्यास शेतक-यांना फायदा होणार आहे. अन्यथा रात्र दिवस रक्ताच पाणी करून पिकवायच आणि कारखानदारांनी शेतक-यांना लुटायचे हे आता चालणार नाही. साखर कारखान्यांच्या काटामारी व रिकव्हरी चोरीबाबत पवार काका – पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही जर AI तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर राज्यातील उस उत्पादक शेतक-यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला असता, असे शेट्टी म्हणाले.

Farmers are being looted by the farmers through graft, why are Pawar uncle and nephew silent, Raju Shetti asks

महत्वाच्या बातम्या