Harshwardhan Sapkal : तीन पक्ष तीन दिशेला असल्याने राजकारण गढूळ, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्तेत असणारे तीन पक्ष श्रेय लाटण्यासाठी तीन दिशेला जात असल्यामुळे राज्याचा कारभार भरकटत चालला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सपकाळ म्हणाले, लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यावर काहीही ठोस निर्णय न घेता केवळ कुरघोडीचे राजकारण, महापुरुषांचे अपमान, धार्मिक वाद, जाती-पातीमध्ये द्वेष पसरवत राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, २४ एप्रिल हा पंचायत राज दिवस असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हातात सत्तेची सर्व सूत्रे ठेवायची आहेत, म्हणूनच महायुतीमधील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देत नाहीत. अडीच-तीन वर्षे होऊनही नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका न घेता प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली सरकारी दलाल बसवले असून त्यांना आदेशावर नाचवले जात आहे.

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या चा आम्ही जाहीर निषेध करत असून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करावा लागेल, असे सपकाळ म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्विमिंग पूलमध्ये ग्रंथ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, याला प्रशासकीय गलथानपणा जबाबदार असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत हसमुख मुथा परिवाराच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्या परिवाराला धीर दिला.

महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून, नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन सपकाळ यांनी दिले आहे.

Politics is muddy because there are three parties in three directions, alleges harshwardhan sapkal

महत्वाच्या बातम्या