Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी या हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती.

शनिवारी, २६ एप्रिल रोजी, जम्मू-काश्मीर प्रशासनाने कारवाई करत काश्मीर खोऱ्यातील ५ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली. शुक्रवारी रात्री कुलगाम, शोपियां आणि पुलवामा या तीन ठिकाणी दहशतवाद्यांची घरे बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली. दुसरा दहशतवादी शाहिद अहमद कुट्टे याचे घर स्फोट घडवून उध्वस्त करण्यात आले. तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन इतर दहशतवाद्यांची घरेही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

https://twitter.com/LalChowkJournal/status/1915969629660316151

भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सिंधू नदी करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यासारखी कडक कारवाई देखील केली आहे.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात असून, दहशतवाद्यांच्या नेटवर्कवर जबरदस्त कारवाई केली जात आहे. भारताच्या या ठाम भूमिकेची दखल घेत, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘दि रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने अवघ्या तीन दिवसांत यू-टर्न घेतला असून, त्यांनी हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

Major operation in Kashmir after Pahalgam terror attack; Houses of 5 terrorists razed to the ground