विशेष प्रतिनिधी
मुंबई : निष्पाप नागरिकांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा हा प्रयत्न असून हल्लेखोरांवर अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्रा फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातीय सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचे मृतदेह आज राज्यात आणले जातील. मुंबईत आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा हे दोन मंत्री सर्व व्यवस्था पाहत आहेत. पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या प्रकरणात लक्ष घालत आहेत. तेथील विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ सर्व व्यवस्था पाहत आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन स्वतः श्रीनगरला पोहोचत आहेत. ते तिथे जाऊन तिथे अडकलेल्या पर्यटकांशी समन्वय साधतील.
ज्या पर्यटकांनी सोशल मीडिया किंवा मेसेजद्वारे प्रशासनाशी संपर्क साधला आहे, त्या सर्वांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत. काही लोकांना इंडिगोच्या विशेष विमानाने आज परत आणले जाणार आहे. आज दिवसभर आढावा घेतल्यानंतर उद्या एखादे विशेष विमान उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे. यासंबंधी तिकिटांची व्यवस्था सरकार करेल.
सद्यस्थितीत आपले सर्व पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित आहेत. पण ते घाबरलेत. ही घटना घडल्यामुळे ते लवकरात लवकर महाराष्ट्रात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारही त्यांना रस्ते किंवा हवाई मार्गाने परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्रालयातील वॉररुमही सक्रिय करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून सर्वांना माहिती देता येईल किंवा घेता येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जम्मू काश्मीरचे प्रशासन या प्रकरणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. त्यांना एखादी गोष्ट विचारली तर तत्काळ त्याचे उत्तर मिळत आहे किंवा ते तशा पद्धतीची व्यवस्था करत आहे. जखमींवर योग्य प्रकारचे उपचार सुर आहेत. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना इकडे आणण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांच्या कुटुंबीयांना इकडे लवकर यायचे असेल तर सरकार त्याचीही व्यवस्था करेल. या प्रकरणी खोऱ्यात अडकलेल्या पर्यटकांचा निश्चित आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. प्रशासनाशी जसा – जसा संपर्क केला जात आहे, त्यातून हा आकडा निश्चित केला जात आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत केली जाईल. अर्थात पैशाने कुणाचेही जीवन परत येत नाही. पण एक आधार म्हणून आपण ते देतो. सरकार या प्रकरणी जे काही करता येईल ते करत आहे. मी स्वतः यात लक्ष घालत आहे. एकनाथ शिंदे व अजित पवारही त्यांच्या परीने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. आपल्या राज्यातील पर्यटकांना अत्यंत सुरक्षितपणे परत आणण्यास सध्या आम्ही प्राधान्य दिले आहे, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हा अतिशय चिड आणणारा हल्ला आहे. त्यात धर्म विचारून निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली. हा देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्यातील मास्टरमाईंडला शोधून काढतील. त्यांनी यापूर्वीही असे केले आहे. या प्रकरणी अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही.
कलम 370 हटल्यानंतर आपण जम्मू काश्मीरमध्ये काहीतरी करू असे अतिरेक्यांना वाटत होते. पण त्यांना काहीच करता आले नाही. उलट जम्मू काश्मीरचा एवढा विकास झाला की, खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक तिकडे गेले. यामुळे तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. खोऱ्यातील फुटिरतावादाची भाषा बंद झाली. दगडफेकीच्या घटना बंद झाल्या. हे सर्व पाहून अतिरेक्यांनी हा हल्ला केला आहे.
या प्रकरणी केंद्र सरकार असेल की, जम्मू काश्मीर सरकार आम्ही सर्वजण एकत्र आहोत. हा भारतीयांवर झालेला हल्ला आहे. त्यामु्ळे यात कोणतेही राजकारण आणण्याची गरज नाही. केंद्राकडे किंवा एलजींकडे कारभार होता तोपर्यंत असे हल्ले झाले नाही. पण हा हल्ला एकप्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे केंद्रासह संपूर्ण देश जम्मू काश्मीर सरकारच्या पाठिशी आहे. या हल्ल्यात स्थानिकांच्या सहभागाविषयी माझ्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. या प्रकरणी तपासी यंत्रणा योग्य ती माहिती देतील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Pahalgam attack is an attempt to create division in the country and society, Chief Minister is angry
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली