विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत संशयाचे वातावरण हाेते. प्रथम ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा हाेत्या. त्यानंतर अजित पवार यांच्यासाेबतची भेट झाल्याने पुन्हा ते चर्चेत हाेते. याच पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्यात जयंत पाटील आक्रमक झाले. नागपूरची दंगल पूर्वनियाेजित हाेती तर तुम्ही काय हजामत करत हाेता का? असा सवाल त्यांनी केला.Jayant Patil
महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी, दंगली तसेच कॉमेडियन कुणाल कामराच्या मुद्याच्या अनुषंगाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर बोलताना जयंत पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केले. ते म्हणाले, नागपूरचे लोक हे शांत स्वभावाचे आहेत, तरीही तेथे दंगल होतेच कशी? नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होती असं सांगता, मग तेव्हा तुम्ही काय हजामत करत होता का?
पूर्वनियोजित कट म्हणजे नियोजन आहे. त्यासाठी कुठेतरी बसले असतील. मग पोलीस खातं काय करत होतं. पोलिसांना पूर्वनियोजित कट आधी पकडता आला तर ते पोलीस खातं. म्हणजे आपणच कबुल करतोय. नागपूरसारख्या शांत प्रवृत्तीच्या शहरात दंगल झाली म्हणजे करणाऱ्यांचं कौतुक आहे. सगळ्यात टॉप स्कील वापरली. त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कारच करायला हवा, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. महाराष्ट्र सावरण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करायला हवं, असेही ते म्हणाले.
2024 मध्ये 69 जातीय दंगली झाल्या. त्यातल्या 12 दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. या दंगली का होतात, कशा होतात, महाराष्ट्राचा आकडा वर जातोय, यातून महाराष्ट्रात किती अस्वस्थता निर्माण झाली आहे, हेही पाहायला हवे. अमरावती, नागपूरमध्ये दंगल झाली. नागपूरच्या दंगलीत असे सांगण्यात आले की, हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय हजामती करत होता का, असा सवाल पाटलांनी उपस्थित केला.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीवरून जयंत पाटलांनी सरकारवर टीकेची झोड उडवली. ते म्हणाले की, “प्रशांत कोरटकर कोण आहे? तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करतोय. त्याला अटक करायला इतका उशीर का लागला? कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यावर त्याला सुरक्षा का दिले जाते? कोरटकर छत्रपतींबद्दल एकेरी बोलतो. अटक झाली असेल तर सरकारन सांगावे. त्यानं झक मारल्यावर त्याला सरंक्षण का दिले गेले?
कामरा वर केस झाली पण सोलापूरकरवर केस का झाली नाही? महाराजांवर, इतर महापुरूषांवर जे बोलले त्यांच्यावर केस कराव्यात असं जयंत पाटील म्हणाले. या सभागृहाशी संबंध नसलेल्या लोकांना पाच-दहा सुरक्षा रक्षकांची सुरक्षा कशी दिली जाते असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरच्या विधानांवर बोलताना असताना मागे बसलेल्या सदस्यांनी कोरटकरला अटक झाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पाटील संतापले. अटक केली असेल तर तसे सरकारने सांगावे. पण त्याला एवढा उशीर का झाला? त्याने झक मारल्यावर संरक्षण का दिले, असा सवाल पाटलांनी केला.
जयंत पाटील यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा हवाला दिला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रध्दा होती. देवदेवता, साधुसंतांची पूजा करायचे. धर्मासाठी दान देत होते. याचा अर्थ त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला, अशीही कुठेही एकही ओळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना मदत केल्याच्या नोंदी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांवर इतक्या वाईट पध्दतीने बोलल्यानंतर त्याला दहा-वीस जणांचे संरक्षण, काय चाललंय काय महाराष्ट्रात? सरकारला काय अभिप्रेत आहे, हे यातून अधोरेखित होतेय. कॉमेडियनवर लगेच गुन्हा दाखल झाला. पण सोलापूरकर, कोरटकरवर लगेच गुन्हा झाला नाही. मागील तीन वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांवर, आमच्या महारापुरुषांवर संतांवर जे-जे बोलले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घोषणा सरकारने आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत गुन्हा दाखल करून दाखवावा, असे आव्हान पाटील यांनी दिले.
जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्षांनी झक मारला हा शब्द कामकाजातून काढण्याबाबत सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी झक मारणे हा शब्द मागे घेतो, त्याऐवजी मासे मारणे, असे नोंदवण्यास सांगितले.
Jayant Patil suddenly became aggressive, what were you shaving when? Question to the government
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप