विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjana Ghadi शिवसेना ठाकरे गटामध्ये ठराविक टोळक्याने पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली असून, निर्णय प्रक्रिया देखील त्यांच्या मनमानीवर आधारित असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या माजी उपनेत्या आणि आक्रमक महिला नेत्या संजना घाडी यांनी केला आहे. कार्यपद्धतीत बदल होण्याची अपेक्षा असतानाही विधानसभेतील पराभवानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्याच शैलीने कारभार सुरू ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Sanjana Ghadi
घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केलं. आपल्या पतींसह त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा राजकीय दणका दिला आहे.
दहिसर भागातून नगरसेवक राहिलेल्या घाडी दाम्पत्याने शिवसेनेच्या दोन गटांमध्ये फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या पक्ष प्रवक्त्यांच्या यादीत संजना घाडी यांचे नावही समाविष्ट होते. मात्र, अंतर्गत असंतोष आणि निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रवेशानंतर बोलताना घाडी म्हणाल्या, “आम्ही प्रामाणिकपणे निरीक्षक म्हणून काम केले, पण तिकीट वाटपात आमच्या कामाची दखलच घेतली नाही. संघटनात्मक कामाची अवहेलना झाली. आम्ही अनेक प्रयत्न करून नेत्यांशी संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आमच्याकडे वेळ देणेही टाळण्यात आले. त्यामुळे संघटनेच्या आणि राज्याच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला.”
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजना घाडींसारख्या नेत्या पक्षातून बाहेर पडल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Shiv Sena Thackeray group under the control of a certain group; Sanjana Ghadi hits out at Uddhav Thackeray while chanting ‘Jai Maharashtra’
महत्वाच्या बातम्या