khadakwasla राष्ट्रवादी काॅंग्रेसची कागदावर ताकद मात्र गेल्या चार निवडणुकांत यशाने हुलकावणी दिलेला खडकवासला मतदारसंघ सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. आता हा मतदारसंघ गनिमी काव्याने ताब्यात घेण्याची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाची खेळी सुरू असल्याची चर्चा आहे. वडगाव शेरीच्या बदल्यात खडकवासला अजित पवार गटाकडे आल्यास सुरक्षित त्यांच्याकडील सुरक्षित मतदारसंघात भर पडणार आहे. पुणे शहरातील बारा वाॅर्डसह खडकवासला ते खेडशिवापूरपर्यंत विस्तार असलेल्या या मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या जास्त आहे. काेथरुडनंतर पुण्याचा विकास याच भागात झाला. पुण्याच्या मध्य वस्तीतील नागरिक इकडे स्थलांतरीत झाले. त्यानंतर इतर जिल्ह्यांतूनही नागरिक या भागात घरे घेऊ लागले. त्यामुळे या भागातील लाेकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरी समस्याही वाढल्या आहेत. वाहतूक कोंडी, खंडित वीज आणि पाणीपुरवठा अशा समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
मतदारसंघ पुर्नरचनेत खडकवासला मतदारसंघाची 2009 मध्ये निर्मिती झाली. या निवडणुकीच्या निकालाने खडकवासला मतदारसंघाची राज्य पातळीवर चर्चा झाली. याचे कारण म्हणजे ‘गाेल्डमॅन’ म्हणून ओळखले जाणारे रमेश वांजळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढताना विजय मिळविला. मनसेला पुण्यातील हे एकमेव यश हाेते. मात्र, रमेश वांजळे यांचे दुर्देवी निधन झाले. त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्या मनसेकडून लढणार असे वाटत असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीने हर्षदा वांजळे यांच्याप्रति असलेली सहानुभूती फायदा घेण्याचा प्रयत्न केला खरा पण ताे त्यांच्यावरच उलटला. भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांनी पाेटनिवडणुकीत विजय मिळविला. तेव्हापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेला ताे गेलाच. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गाेपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीत लक्ष घातले हाेते. अजित पवारांची पाठ मी खडकवासल्याच्या मैदानात लाेळवली आहे, असे ते म्हणत हाेते. तेव्हापासून अजित पवार यांनी खडकवासला जिंकण्यासाठी हर एक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 2019 च्या निवडणुकीत तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सचिन दाेडके यांचा केवळ 2, 595 मतांनी पराभव झाला हाेता. ते आता शरद पवार गटामध्ये असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्याबराेबरच काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचीही नावे चर्चेत आहेत. khadakwasla
रतन टाटा गेल्यानंतर वारसा कोण सांभाळणार?, एन. चंद्रशेखरन यांच्यासह सावत्र भाऊ नोएल टाटांचे नाव पुढे
यंदाची निवडणूक अजित पवार गट विरुध्द शरद पवार गटात हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघाच्या बदल्यात खडकवासला आपल्याकडे घेण्याची अजित पवार गटाची इच्छा आहे. तसे झाल्यास अजित पवार यांच्या निष्ठावंत रुपाली चाकणकर यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्या या मागच्या विधानसभेसाठीही या मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक होत्या. त्याचबराेबर माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचे नाव चर्चेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तापकीर आणि बराटे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तापकीर यांनी बराटे यांचा ६३ हजार २६ मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी जवळीक असणारे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूर वांजळे यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांचे फलक संपूर्ण मतदारसंघात झळकत आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी तालुकाप्रमुख संदीप मते, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख महेश पोकळे लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोंडे यांनी युतीधर्माचा विचार करत माघार घेतली होती. khadakwasla
मात्र, भाजपने अजित पवार किंवा शिंदे गटाला आपला बालेकिल्ला देण्यास नकार दिला तर उमेदवार काेण हा प्रश्न आहे. कारण सलग तिसऱ्यांदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी मिळेल का याबाबत शंका आहे. त्यामुळे भाजप नवा चेहरा मैदानात उतरवू शकते. यामध्ये विकास दांगट यांचे नाव आघाडीवर आहे. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, दीपक नागपुरे यांनीही तयारी केली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश बारामती लाेकसभा मतदारसंघात हाेताे. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना खडकवासला मतदारसंघ वगळता दुसऱ्या काेणत्याही मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती. खडकवासल्याने मात्र त्यांना 20, 446 मतांची आघाडी दिली. मात्र,अगदी अजित पवारांपासून सगळ्यांनाच याची पूर्ण कल्पना आहे की ही भाजपची परंपरागत मते आहेत. कारण 2019 मध्ये कांचन कुल भाजपकडून लढल्या हाेत्या. त्यांना तब्बल 65, 494 मतांची आघाडी मिळाली हाेती. घटलेली मते अजित पवारांविषयी नाराजी मानली तर आपला बालेकिल्ला त्यांना देऊन एक जागा धाेक्यात आणण्यास भाजप तयार हाेइल का हाच प्रश्न आहे.
khadakwasla Vidhansabha candidate ?
महत्वाच्या बातम्या
- foreign exchange देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक
- Noel Tata: नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड; ट्रस्टने एकमताने घेतला निर्णय
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे