विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetty) यांच्या ‘श्री. सिद्धेश्वर विकास पॅनल’ने दणदणीत यश मिळवले आहे. एकूण १८ जागांपैकी १५ जागांवर कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने विजय मिळवला, तर माजी सहकार मंत्री व भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या ‘श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल’ला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
निर्णायक समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील सर्व ११ जागांवर कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. ग्रामपंचायत गटात मात्र ४ पैकी ३ जागांवर देशमुख यांच्या पॅनलचा विजय झाला. या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या विजयाला मोठी चालना मिळाली.
माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली. आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जवळपास ७५ टक्के मते मिळाली आहेत. ग्रामपंचायत पदांमध्ये आम्ही थोडे मागे पडलो, याचे निरीक्षण करू. मात्र मार्केट कमिटीचा कारभार एकोप्याने चालवू. सभापती पदाबाबत आ. कल्याणशेट्टी आणि आम्ही एकत्र निर्णय घेऊ, आणि आवश्यक असल्यास मुख्यमंत्री जो निर्णय देतील, तो आम्ही स्वीकारू. शेतकरी हितासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.”
विजयानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, “आम्हाला त्यांच्याच्या तुलनेत तीनपट अधिक मते मिळाली. शेतकरी बांधवांनी प्रचंड मताधिक्याने साथ दिली. १८ पैकी १५ जागा आम्ही जिंकलो, जिथे आम्ही कमी पडलो तिथे आत्मपरीक्षण करू. आम्हाला सर्व १८ जागा जिंकण्याची अपेक्षा होती, दुर्दैवाने ३ जागा गेल्या, त्यावरही विचार करणार आहोत.”
सभापती निवडीबाबत ते म्हणाले, “सभापतीसाठी कोणतीही चुरस नाही. मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू. आजही निकालानंतर आम्ही सर्व एकत्र आहोत.”
ते पुढे म्हणाले, “माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या तीन उमेदवारांचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. राजकारणात हार-जीत होत असते. मार्केट कमिटीचे काम करताना विरोधी तीन उमेदवारांनाही विश्वासात घेऊन काम करू. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून नावारूपास आणण्याचा आमचा संकल्प आहे.”