NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात

भाजप-जेडीयू समान जागांवर लढण्याची शक्यता, चिराग पासवानांची ४० जागांची मागणी

विशेष प्रतिनिधी

पाटणा: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड) हे दोन्ही मोठे पक्ष साधारण १०० ते १०५ जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

२०२० च्या निवडणुकीत जेडीयूने ११५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ ४३ जिंकले. भाजपने ११० जागांवर लढून ७४ जागा जिंकल्या. निकालात मोठा फरक असला तरी नेतृत्व नितीशकुमारांकडेच राहिले होते. यंदाही जेडीयू १०० पेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही.



दरम्यान, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यावेळी एनडीएचा भाग आहे. त्यांनी ४० जागांची मागणी केली आहे, मात्र ती मान्य होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चिराग पासवान यांनी मागील निवडणुकीत स्वतंत्रपणे ११५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यात केवळ एकच जागा मिळवली. परंतु, त्यांच्या पक्षामुळे जेडीयूच्या ३० पेक्षा जास्त जागांवर नुकसान झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

याशिवाय, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री जितनराम मांझींचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर), उपेंद्र कुशवाहांचा राष्ट्रीय लोक मोर्चा, तसेच विरोधकांसोबत असलेली विकासशील इंसान पार्टी (मुक्केश साहनी) जर एनडीएमध्ये आली, तर समीकरण आणखी बदलण्याची शक्यता आहे.

महागठबंधनही या निवडणुकीत जोरदार तयारी करत असून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी ‘वोटर अधिकार यात्रा’ सुरू केली आहे.

NDA’s seat-sharing talks for Bihar elections in final stage

महत्वाच्या बातम्या