SIR process : महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रिया जूनपासून; अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई- : SIR process  राज्यातील सुमारे 9 कोटी 48 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. जूनपासून सुरू होणारी ही प्रक्रिया ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत.SIR process

भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात एसआयआरचा निर्णय घेतला आहे. देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात याअंतर्गत 9,69,88,493 मतदारांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 1,00,253 बीएओ नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या 72% मॅपिंग पूर्ण करण्यात आलं आहे.SIR process



गेल्या 20 वर्षांत राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण झालेले नसल्यानं मतदार याद्यांमध्ये दुबार नावे, स्थलांतरित मतदारांची अपूर्ण माहिती आणि मृत व्यक्तींची नावे कायम असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. झपाट्यानं झालेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवलं. मात्र, जुन्या ठिकाणाहून नाव कमी केलं नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम म्हणाले, जे नागरिक भाड्यानं दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांचा मूळ पत्ता वेगळा असेल, त्यांनी फॉर्म क्रमांक 6 मध्ये त्याची नोंद करू शकतात. त्यामुळे ज्या पत्त्यावर फॉर्म भरला जाईल, तो पत्ता ग्राह्य धरला जाईल. नंतर संबंधित व्यक्ती मूळ पत्त्यावर परत गेल्यास मतदार नाव तिकडे स्थलांतरित होईल. यामध्ये दुबार नोंदणी होणार नाही.

घर बंद असल्यास संबंधित घराला किमान तीन वेळा भेट देण्यात येणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मतदारांना ही माहिती ऑनलाइन पद्धतीनंही भरता येणार आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांना पूर्वभरलेले गणना प्रपत्र वाटणार आहेत. या प्रपत्रात मतदारांची सध्याची माहिती तसेच 2002-2004 मधील विशेष पुनरीक्षणावेळची माहिती नमूद असेल. मतदारांना नवीन छायाचित्रही सादर करता येणार आहे. मतदारांकडून प्राप्त माहितीनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर हरकती नोंदविण्याची प्रक्रिया 8 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. ज्या मतदारांची माहिती जुन्या नोंदींशी जुळणार नाही किंवा त्रुटी आढळतील, त्यांना नोटीसदेखील पाठविण्यात येणार आहे.

नागरिकत्वाचा नाही- निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे की, आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. मात्र, आधार अधिनियम 2016 च्या कलम 9 नुसार ते नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा आहे. नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्यामुळे आधार कार्डसाठी स्वतंत्र पर्यायी कॉलम उपलब्ध करून देण्यात आला आहे”.

मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे. सध्या राज्यात फक्त 1,93,558 BLA नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयोगानं दिली. तसेच, प्रत्येकाने कायद्यानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. कोणाचेही नाव अनावश्यक पद्धतीनं वगळले जाणार नाही, याची आम्ही खात्री देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केलं. पूर्वी मतदार यादीत किती नावे होती आणि त्यापैकी किती नावे वगळण्यात आली, याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल, असेही चोकलिंगम यांनी सांगितलं.

Maharashtra to begin SIR process from June; final voter lists to be published on October 7

महत्वाच्या बातम्या