विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता या भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या वक्तव्यावरून राजकीय गदाराेळ सुरू झाला आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी तर तहव्वूर राणासाेबत माधव भांडारी यांचीही चाैकशी करावी. ताेपर्यंत त्या काळात मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे.
एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी 26/11 हल्यासंबंधी आरोप करताना तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता. मुंबईवरील 26/11 चा हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. कारण स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे, असे ते म्हणाले, यावर सपकाळ म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी 26/11 च्या हल्ल्या प्रकरणी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. त्यामुळे आता माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. तसेच अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते आणि आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रिपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचे नेते किती खरे बोलतात, ते आता समोर येईल, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.
हिंदी सक्तीच्या निर्णयावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरू आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरातमध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे. त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे, पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा, ही आमची मागणी कायम आहे.
Dismiss Ajit Pawar from the cabinet, Harshwardhan Sapkal demands after Madhav Bhandari’s statement
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत