विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठामपणे आवाहन केले आहे की, “पाकिस्तानाचे दोन तुकडे करून पाकिस्तान अधिकृत काश्मीर (PoK) भारतात विलीन करा. आम्ही सर्व १४० कोटी भारतीय तुमच्या सोबत आहोत.
हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित कँडल मार्चदरम्यान रेवंत रेड्डी बोलत होते. ते म्हणाले, “दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या ह्रदयात संताप धगधगतो आहे. ही वेळ राजकारणाची नाही, निर्णायक कारवाईची आहे.”
रेड्डी यांनी इतिहासाची आठवण करून दिली की, १९६७ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला असताना इंदिरा गांधींनी खंबीर प्रतिसाद दिला. १९७१ मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यानंतर त्यांनी पाकिस्तानाचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती केली. आज पुन्हा तोच क्षण उभा राहिला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. आता चर्चेचा काळ संपला आहे. निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या कारवायांचा सडेतोड प्रतिकार करायलाच हवा.”
या कँडल मार्चमध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी ट्विट करून म्हटले, “आम्ही सर्वजण दहशतवादाविरोधात एकत्र आहोत. मी रेवंत रेड्डी आणि हजारो भारतीयांसोबत पहलगाम हल्ल्याच्या निषेधासाठी आयोजित कँडल मार्चमध्ये सहभागी झालो.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे झालेल्या सभेत पहलगाम हल्ल्यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. आम्ही त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या टोकापर्यंत करू. भारताचा आत्मा कधीही दहशतवादाने मोडू शकणार नाही,” असा ठाम इशारा मोदींनी दिला.