राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच परांजपे यांचा पक्ष प्रवेश, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर झाला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी आज केले. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, महायुतीत मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, असे सामंजस्याने ठरले आहे. मात्र एखादा पदाधिकारी स्वत:हून पक्ष सोडणार असेल तर त्याने महायुतीतच राहावे ही आमची जबाबदारी आहे. परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत परांजपे यांनी तो निर्णय घेतला, असे मंत्री सामंत म्हणाले.



ते पुढे म्हणाले की परांजपे यांचा डीएनए शिवसेनेचाच असल्याने ते स्वगृही परतले. परांजपे यांनी पक्ष प्रवेशावेळी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. परांजपे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, जो निराधार आहे, असे ते म्हणाले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मित्र पक्ष आहे. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे सचिव जय पवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना परांजपे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत कल्पना दिली. परस्पर चर्चेनंतरच परांजपे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला, असे मंत्री सामंत म्हणाले. परांजपे यांनीही कुठेही राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराजी किंवा टीका केलेली नाही. त्यामुळे परांजपे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न निराधार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व मंत्र्यांना काटकसरीचे आदेश दिले होते. उद्योग विभागानेही ईव्ही वाहनांचा वापर वाढवला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Anand Paranjpe joined Shiv Sena only after talks with NCP leaders, clarifies Uday Samant

 

महत्वाच्या बातम्या