Suresh Dhas राजीनामा घ्यायचा नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा

विशेष प्रतिनिधी

पुणे : आर आर पाटील, विलासराव देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. महायुतीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो. यांचा राजीनामा घ्या, आमच्या मुलाला न्याय द्या. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिनखात्याचा मंत्री करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, यावेळी बोलताना आमदारसु रेश धस म्हणाले की, मी अजितदादांवर टीका केली नाही. पण यांनी घेरा घातलाय त्यांना. ते लायकवान माणसं नाहीत. अजितदादांनी डोळे उघडून खाली पाहिलं पाहिजे की नेमकं काय चाललं आहे. बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्य समोर येईल. तो सूरज चव्हाण माझ्यावर बोलला. अरे तो अजून बालवाडीतही नाही. तुम्ही काय बोलायचं ते बोला. मला संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवायचं नाही. फक्त मराठा समाज नाही तर संपूर्ण जातीपाती या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत.

मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो. घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल करत सुरेश धस म्हणाले, जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा. बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय .

दरम्यान पत्रकारांशी बोलताना धस म्हणाले, 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते. परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली.

नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे, पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे राज बाहेर येतील असे सांगून धस म्हणाले, ५० लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले, उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले तेव्हा वॉचमनला मारले. तेव्हा संतोष देशमुख तिथे मध्ये गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला.नितीन कुलकर्णी नावाचा आका वाल्मिक कराड यांचा पीए आहे. तो १७ मोबाईल नंबर वापरतो. नितीन कुलकर्णीला अटक करुन १७ मोबाईल जप्त करा वाल्मिक कराड यांची जिथे जिथे जमीन सापडते ती १०० ते १५० एकरने सापडते, ५० बॅंक खाते आतापर्यंत सील केलेत उर्वरीत करावेत अशी मागणी आहे 50 अकाउंट्सच्या पुढे ईडीची चौकशी लागते यामध्ये ईडी येईल. ईडीच्या अधिकाऱ्यांना, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे. वाल्मिक कराड यांच्या बॉडीगार्डला सुद्धा तपासात घ्या

धस म्हणाले, धनंजय मुंडे यांचा यात किती सहभाग आहे ते तपासावा. त्यात त्यांचा सहभाग असेल तर ते सुद्धा या गुन्ह्यात येतील नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही. अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय करावा. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत.

If you don’t want to resign, make him a minister with no charge, Suresh Dhas again targets Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या