विशेष प्रतिनिधी
मुंबई : अशी वक्तव्ये करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना सुनावले आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना ओळख पटवून वेगळं केलं आणि गोळ्या घालून ठार केले.
पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं आणि गोळ्या घातल्या. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? असा सवाल केला आहे. हे विधान असंवेदनशील असल्याचा संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची वक्तवे करुन जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चाललं आहे. नातेवाईकांचे म्हणणं सगळ्यांनी दाखवलं. ज्यांच्या समोर मारले त्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करुन नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाहीये.
“वडेट्टीवारांचे विधान हे असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करु शकणार नाही. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.