ऐश्वर्या थोरात यांच्या प्रश्नामुळे पालिका प्रशासन हलले ; लहुजी वस्तादांच्या तालमीला लवकरच मिळणार ‘हेरिटेज’चा दर्जा!

विशेष प्रतिनिधी

पुणे: क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी १८२२ मध्ये पुण्यातील गंज पेठ येथे देशातील पहिले ‘क्रांतिकारी प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले होते. या ऐतिहासिक वास्तूला अधिकृत वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली असून, इतकी वर्षे हा दर्जा का मिळाला नाही, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.Aishwarya Thorat

नगरसेविका ऐश्वर्या थोरात यांनी वेधले लक्ष

पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका ऐश्वर्या थोरात यांनी हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “संगमवाडी येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे ११५ कोटी रुपये खर्चून भव्य स्मारक उभारले जात असताना, त्यांच्या मूळ कर्मभूमीची अर्थात गंज पेठेतील तालीम आणि शाळा परिसराची मोठी दुरावस्था झाली आहे. ही वास्तू म्हणजे सामाजिक क्रांतीचे उगमस्थान आहे, तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष का होत आहे?”

या तालमीचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना त्यांनी नमूद केले की, महात्मा जोतिराव फुले, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि सदाशिवराव परांजपे यांसारख्या युगपुरुषांनी येथे युद्धकलेचे आणि क्रांतीचे धडे गिरवले आहेत. अशा जागतिक दर्जाच्या वारसा स्थळाचे जतन करण्यासाठी विशेष ‘हेरिटेज संवर्धन आराखडा’ तयार आहे का, असा सवालही त्यांनी केला.



प्रशासनाची भूमिका आणि उपाययोजना

ऐश्वर्या थोरात यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र हेरिटेज विभाग कार्यरत आहे. शिवाय राज्य सरकारचे देखील स्वतंत्र विभागाच्या माध्यमातून लवकरच या बाबत समिती स्थापन करून,गंज पेठेतील या ऐतिहासिक तालमीला लवकरच ‘ऐतिहासिक वारसा’ म्हणून घोषित करण्यात येईल.

शिवाय ऐतिहासिक दृष्ट्या इतके महत्त्व असूनही आजवर या वास्तूला वारसा यादीत स्थान का मिळाले नाही, याची चौकशी केली जाईल. तर या जागेचे तातडीने सीमांकन करून संरक्षण भिंत उभारण्याबाबत विचार केला जाईल.

या जागेचे पावित्र्य जपण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी येथे माहिती फलक किंवा संग्रहालय उभारण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे.
मातंग समाजाच्या विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, मुख्य सभेने या प्रस्तावास एकमताने मंजुरी देऊन पुण्याच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकावी, अशी आग्रही मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे. या निर्णयामुळे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या खऱ्या कर्मभूमीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Municipal Administration Stirred by Aishwarya Thorat’s Query

महत्वाच्या बातम्या