UNESCO : भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राला ‘युनेस्को’ची जागतिक मान्यता; भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा जागतिक सन्मान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : UNESCO भारतीय ज्ञानपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर डंका वाजला असून भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोन महान ग्रंथांचा समावेश ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये करण्यात आला आहे. या मान्यतेमुळे हे स्पष्ट झाले आहे की, हे ग्रंथ केवळ भारतापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.UNESCO

भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा एक कालातीत ग्रंथ आहे. महाभारताच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले धर्म, कर्म, योग आणि आत्मज्ञानाचे शिक्षण आजही तितकेच प्रभावी आहे. गांधीजींपासून ते टॉल्स्टॉय, आइन्स्टाईन यांसारख्या विचारवंतांनीही गीतेच्या तत्त्वज्ञानाला मान्यता दिली आहे. गीतेचा ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हा संदेश आजच्या नैतिक संकटात सापडलेल्या जगाला दिशा देतो.

भरतमुनींनी रचलेले ‘नाट्यशास्त्र’ हे रंगभूमी, नृत्य, संगीत आणि अभिनयावरचे जगातील पहिले आणि सर्वाधिक सविस्तर ग्रंथ मानले जाते. रस सिद्धांत, अभिनयाचे नियम, रंगमंचीय शैली, प्रेक्षकांची भूमिका या सगळ्यांचा अभ्यास यात एकत्रितपणे आहे. ६ हजाराहून अधिक श्लोकांचा हा ग्रंथ केवळ नाट्यतज्ज्ञांसाठी नाही, तर मानवी भावभावना समजून घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे.

यावर्षी ‘युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये ७२ देशांतील ७४ नवीन संग्रहांची नोंद करण्यात आली. भारताच्या गीता आणि नाट्यशास्त्राच्या समावेशामुळे या नोंदींची एकूण संख्या ५७० झाली आहे. या यादीत भारताच्या १४ नोंदी आहेत, ज्यामध्ये ताम्रपट, ऋग्वेद, पंचतंत्र, रामचरितमानस यांचाही समावेश आहे.

या जागतिक मान्यतेमुळे भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ची भर घातली गेली आहे. ही मान्यता केवळ सांस्कृतिक सन्मान नसून, भारताच्या ज्ञान, तत्त्वज्ञान आणि कलात्मक परंपरेच्या जागतिक स्वीकाराचे प्रतीक आहे. या माध्यमातून भारताचे प्राचीन ग्रंथ आता डिजिटायझेशन आणि जागतिक संशोधनाच्या दिशेने वाटचाल करतील.

आज जेव्हा जग नैतिक अधःपतन, आध्यात्मिक अशांतता आणि सांस्कृतिक गोंधळाचा सामना करत आहे, तेव्हा गीतेचा निष्काम कर्मयोग आणि नाट्यशास्त्राचा रस सिद्धांत मानवजातीला नवी दृष्टी देण्याची क्षमता ठेवतो. ‘युनेस्को’ने दिलेली ही मान्यता भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा नवा अध्याय ठरतो.

UNESCO’s global recognition of Gita and Natya Shastra; Global respect for India’s cultural tradition

महत्वाच्या बातम्या